महती काय वर्णावी प्रेमाचिया !
"हमे जबसे मोहोब्बत हो गयी है
ये दुनिया खुबसुरत हो गयी है"
खरंच, माणुस प्रेमात पडतो तेंव्हा त्याला सगळं चांगलं चांगलं दिसायला लागतं.
तो प्रेमाखातर जगायला लागतो, उत्साही बनतो.
प्रत्येक दिवसाचं स्वागत मोठ्या आनंदानं करतो.
रात्र त्याला भारी जाते, प्रत्येक क्षण भरभरून जगण्याची उर्मी त्याला झोपू देत नाही.
कारण झोप म्हणजे त्या प्रिय व्यक्तीचा विसर, जो त्याला मान्य नसतो.
कितीही आळशी माणुस असो प्रेमात पडल्यावर तो लवकर उठायला लागतो.
त्याचं जीवन सकारात्मक उर्जेने भारून जातं.
एखादा कंजुस असलेला माणुस जेंव्हा प्रेमात पडतो तेंव्हा अचानक दान-धर्म करायला लागतो.
आपला एखादा चिक्कु मित्र एकाएकी जेंव्हा खिसा मोकळा करू लागतो तेंव्हा समजुन जावं,
साहेब पडलेत कुठेतरी - प्रेमात.
एकलकोंडा माणुस त्याच्या\तिच्या साथीने हळुहळु माणसात यायला लागतो, मित्र बनवायला शिकतो.
त्याला कळू लागतं कि ही दुनिया किती सुंदर आहे आणि चांगल्या लोकांनी भरलेली आहे.
आपण उगाच इतकी वर्षे आपल्या कोषात घालविली.
किती हे प्रेमाचे सामर्थ्य जे एका प्रिय व्यक्तीसाठी सगळ्या जगाशी नाते जोडायची उर्मी माणसाला प्रदान करते.
जे माणसं जोडायला शिकवतं तेच खरं प्रेम हि कसोटी नेहमी लक्षात ठेवावी.
प्रेमाची ही अडीच अक्षरे भल्याभल्यांना अंधारातुन बाहेर काढतात
तमसो मा ज्योतिर्गमय हा मंत्र देतात.
कधी घडलंय का यातलं काही तुमच्यासोबत. बघा बघा नीट आठवुन बघा. 









टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा